तुमच्या मुलाच्या अभ्यासची गती वाढण्यासाठी एक सोपी युक्ती

जेव्हा मुले संध्याकाळी खेळून घरी येतात, क्लासला जाऊन येतात, किंवा दमून घरी येतात, तेव्हा कधीही मुलांना आल्या-आल्या “आता अभ्यासाला बसा” असं अजिबात सांगू नका. विशेषत: खेळून आल्यावर तर नाहीच नाही. कारण ‘अशावेळी’ हे वाक्य ऐकलं की मुलांना संताप येतो. अभ्यासाविषयी मनात अनास्था निर्माण होते. आणि मग अभ्यास न करण्याच्या नवनवीन सबबी मुले सुरू करतात. या सबबी ऐकल्या की तुमचं डोकं फिरू लागतं. अशावेळी तुमच्या मुलाला समजून घेण्याऐवजी, तुमच्या अंतर्मनात दडून असलेला राग एकदम उसळून वर येतो, तुम्ही बोलू लागता, “एव्हढावेळ खेळ झाला, टाइमपास झाला, तरी समाधान झालं नाही. अजूनही तुला अभ्यास करायचा नाही. तू काय ठरवलं आहेस तरी काय?”

लक्षात घ्या, या तुमच्या प्रश्नाला उत्तर न देता मुलं गप्प बसतात. तुमच्याकडे एकटक पाहात तरी राहतात, किंवा तुमची नजर चुकवून, नेमकी तुम्हाला नावडणारी एखादी कृती करतात. या गोष्टीचा तुम्हाला निश्चितच अतिशय राग येतो. आणि मग तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला तुम्हीच उत्तर देता, जी तुम्हाला सोयीची असतात.

 यामुळे, तुम्ही आणि तुमचा मुलगा यामधे विनाकारण नकळत क्रोधामुळे, एक दरी निर्माण होते. अभ्यास बाजूलाच राहतो. विषय भरकटतो. आणि सगळा राग त्या मुलावर म्हणजेच, पर्यायाने अभ्यासावर निघतो. अशा संतप्त वातावरणात, आणि ज्वालामुखीच्या सहवासात, मुले कदापी अभ्यास करू शकत नाहीत.

हे सारं घडल, कारण तुम्ही तुमच्या मुलाचं मन समजून न घेता, त्याला विश्वासात न घेता, त्याची प्रेमाने विचारपूसही न करता, थेट तुम्ही त्याला झापायलाच सुरुवात केली आहे. 

आपण बदलूया. आपण आपलं मूल अधिकाधिक समजून घ्यायचा प्रयत्न करुया. त्याच्यावर विश्वास टाकूया, आणि पाहा चमत्कार होतो की नाही...!!!

मुलगा संध्याकाळी दमून घरी आला, क्लासमधून घरी आला, किंवा खेळून घरी आला की, लगेचच अभ्यासाचा विषय काढूच नका. आज दिवसभरात काय मजा आली? ते विचारा. त्याच्या खास मित्र मैत्रिणींची चौकशी करा. 

‘तू दमला असशील, आता पाच मिनिटं अगदी शांत निवांत बस बघू...’ असं ही म्हणा आणि मग, “आता आपण तुझ्या अभ्यासाचे पाहूया” असं स्मितहास्य करीत त्याला अगदी सहज म्हणा... थोडं स्थिरस्थावर व्हायला त्यालाही थोडा अवकाश द्या. विश्वास ठेवा, यानंतर मुले मनापासून अभ्यास करतात.

सक्ती केल्याने, लादल्याने, अभ्यासाबाबत टोचून बोलल्याने, किंवा सारखे कर-कर म्हंटल्याने, मुले अजिबात अभ्यास करत नाहीत... ती फक्त ‘अभ्यास करत असल्याचा देखावा’ करतात. पुस्तक डोळ्यासमोर आणि मनात विचार दुसरेच. कारण तुमच्या अशा वागण्याने त्यांना असुरक्षित वाटत असतं.

पालक जेव्हा आपलं मन मोठं करतात, आणि आपल्या प्रेमाची जाणीव आपल्या कृतीतून करुन देतात, तेव्हा त्यांची मुलं आश्वस्त होतात. जेव्हा दडपण नसत, तेव्हा मुलांना अभ्यासाचा देखावा करावा लागत नाही. मुले मोकळ्या मनाने अभ्यास करतात. आणि हेच तर आपल्याला हवं आहे. 

‘जेव्हा पालक स्वत:त दहा टक्के बदल करतात, तेव्हा मुलात शंभर टक्के बदल होतो’, हे लक्षात घ्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समस्या आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा समस्यांच्या मुळाशी जावून कायमची संपवा !! भगवंत चव्हाण

शिक्षणाचे महत्त्व मराठी निबंध | Importance Of Education Essay In Marathi